महायुतीत सन्मानजनक जागा न दिल्यास रासपची ताकद दाखवून देऊ : महादेव जानकर
वर्धा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा
वर्धा (२८/०७/२४) : रोजी वर्धा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. आपला पक्ष महाराष्ट्रातील महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे ६० जागाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मागणी करण्यात आली आहे. सन्मानजनक जागा नं मिळाल्यास पूर्ण २८८ जागा लढण्याची तयारी सुरू आहे. नवे मित्र शोधण्याची गरज नाही, असा खणखणीत इशारा जानकर यांनी दिला.
श्री. जानकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाच्या गाव तिथे शाखा बांधा. फलक लावा. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत, नगर पालिका निवडणूक लढवायची असून चारही विधानसभा क्षेत्रात उमेदवार देणार आहोत. त्यासाठी सक्षम उमेदवार शोधा. आपले सर्व उमेदवार निवडून येणार नाहीत. पण महायुतीस आपली ताकद दिसेल. देशातील सात राज्यात रासपचे मोठे काम आहे. त्या राज्यात लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. सन्मानजनक मते मिळाली. महाराष्ट्रात आपले ७८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. काही जिल्ह्यात महानगर पालिका, नगर पालिका व पंचायत सदस्य आहेत. यापुढे केवळ फलकावर फोटो नकोत. ओबीसी, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय यांच्यासाठी पक्षाचे दार उघडे आहे. उपेक्षित बहुसंख्यांक राष्ट्रीय समाजाला याच पक्षात मान सन्मान मिळतो. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी अहंकार बाळगत नाही. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पालख्या वाहणे सोडून द्या. मी स्वतः विधानसभा निवडणूक लढणार नाही. पक्षाचा उमेदवार ज्या मतदारसंघात उभा आहे, तिथे प्रचारास जाणार. एक नाही तर तीन सभा घेईल. कामाला लागा. केवळ ६० दिवस शिल्लक आहे. वेळेवर धावपळ नकोच.
रासपचे संघटक राजू गोरडे यांनी राजकीय स्थिती मांडली. लोकसंख्येच्या तुलनेत विदर्भात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे विदर्भ अध्यक्ष प्रा. तौसिफ़ शेख यांनी सांगितले. मेळाव्यात प्रा. राजेंद्र बाणमारे व अरुण लांबाडे यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. नितीन सुळे, पद्माकर कांबळे, राजू भगत, सचिन डहाके, नजीर शेख, नागोराव सेवासे, प्रताप पाटील, धनराज लोखंडे, अंजली मजिठीया, अंजली शिरपूरकर, साक्षी गिरडकर, रामेश्वर लांडे, सुभाष कडे, चंद्रशेखर भेंडे यांनी संयोजन केले. पक्षाची महिला, शेतकरी, युवा आघाडी स्थापन करण्याचा निर्णय या प्रसंगी घेण्यात आला. या मेळाव्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ. तौसीफ शेख, अकोला जिल्हा अध्यक्ष दादाराव ढगे, अकोला जिल्हा युवक अध्यक्ष केशव मुळे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकुर, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवदास अक्कलवार, विदर्भ महासचिव संजय कन्नावार, विदर्भ सचिव गणेश मानकर, वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख राजु भाऊ गोराळे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय समाज पक्षाला समाधानकारक, सन्मानजनक जागा न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष निश्चितपणे भाजपची डोकेदुखी वाढवणार, असे जनमानसात चर्चा सुरू आहेत.
No comments:
Post a Comment