Sunday, September 29, 2024

राज राजेश्वर नगरीतून राष्ट्रीय समाज पक्षाने फुंकले रणशिंग; 288 जागा लढवण्याचा निर्धार

राज राजेश्वर नगरीतून राष्ट्रीय समाज पक्षाने फुंकले रणशिंग; 288 जागा लढवण्याचा निर्धार

आपल्या जातीचा माणूस बघू नका, आपल्या पातीचा माणूस बघा : महादेव जानकर 

वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करताना रासप संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर
अकोला (२९/८/२४) : आपल्या जातीचा माणूस बघू नका, आपल्या पातीचा माणूस बघा. राष्ट्रीय समाज पक्ष ज्याला तिकीट देईल, तोच माझ्या जातीचा, तोच माझ्या पातीचा, तोच माझा भाऊ, तीच माझी आई. माझ्यावर तुम्ही प्रेम करत असाल तर, आम्ही दगड दिला तरी तुम्ही दगडाला आमदार, खासदार केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अकोला येथे केले. मराठा मंडळ सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष 21 वा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी पक्षाध्यक्ष महादेव जानकर बोलत होते. यावेळी फुलेपिठावर रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, ज्येष्ठ नेते गोविंदराव शुरनर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ईशान्य भारत प्रभारी प्रा. डॉ. मनोज निगडकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, गुजरात राज्य अध्यक्ष सुशील शर्मा, कर्नाटक राज्य अध्यक्ष धर्मंन्ना तोंटापूर, राजस्थान प्रभारी श्री. लक्ष्मण पुरोहीत, मध्यप्रदेश अध्यक्ष प्राणसिंह पाल, बिहार राज्य अध्यक्ष गोपाल पाठक, उत्तर प्रदेश उपाध्यक्ष उपाध्याय, गुजरात राज्य युवा अध्यक्ष विक्रम राठोड, कर्नाटक राज्य सरचिटणीस सुनील किन्नुर, रासेफ दिल्ली अध्यक्ष वीर पाल, झारखंड राज्य प्रभारी अनिल झा, बिहार राज्य उपाध्यक्ष चित्तरंजन गिरी, मध्य प्रदेश महासचिव रामविलास चिराग, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य बबनदादा विरकर, राज्य सचिव भाऊसाहेब वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
सभागृहात उपस्थित असलेले रासपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हिचिंतक.

महादेव जानकर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाने ३० वर्षात काय केले हे सांगणारा आजचा कार्यक्रम आहे. मी ३० वर्षापूर्वी ठरवले होते की, एकटेच चालत जायचं दिल्लीला, त्यावेळेस मला मोलाची साथ दिली ती एस. एल. अक्कीसागर नावाच्या माणसान. पत्रकार बंधुं भगिनींनो मी ठरवले होते दिल्लीला जायचे, पण स्वत:च्या रस्त्याने जायाचे. एक रस्ता भाजपचा आहे, अटलजी, वाजपेयींनी बनवलेलाय, तो सिमेंट काँक्रिटचा आहे. एक रस्ता आहे नेहरूंनी बनवलेला डांबरीकरणाचा. मी रस्ता बांधण्याचा प्रयत्न केलाय तो दगड धोंड्याचा आहे. पांणद रस्ता आहे. हा माझा आणि त्यांच्यातला फरक आहे. स्वतंत्र्यापासून काँगेसने राज केलेले आहे, अटलीजींच्या पासून राज केलेला भाजप दुसरा पक्ष आहे. तुम्ही म्हणाल २००३ मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष का उभा केला? महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचे झाले तर, पत्रकारांनों, जी माणस काँगेसमधून मंत्री होती, तीच माणसं भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत का नाही.? याचा अभ्यास आपण जनेतेने केला पाहिजे आणि मार्ग निवडला पाहिजे. 

दिपप्रज्वलन करताना राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी व राज्यातील प्रमुख पदाधिकारी

श्री. जानकर पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या अध्यक्षाची इच्छा नव्हती की, आपण महायुतीबरोबर युती करावी. ती चूक माझी आहे, महाराष्ट्राच्या अध्यक्षाची नाही. ती चूक मी मान्य करतो. त्याचवेळेस ४८ जागा लढल्या असत्या तर दिवस चांगले आले असते. पण मी काय विचार केला, आपल्या कार्यकर्त्याजवळ पैसा नाही. म्हणून मी महायुतीबरोबर एक जागा घेतली. दुर्दैवाने तिथेही आपला पराभव झाला. महादेव जानकर यांचा फोटो लावून चार राज्यात सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरसेवक, आमदार जिंकलेत. फक्त खासदारकीत पराजय झालेला आहे. 20 वर्षात आपला पक्ष खासदार जिंकू शकलेला नाही, ही खंत घेऊन अकोल्याला आलेलो आहे. 

अकोल्यात विदर्भात कार्यक्रम का घेतलाय? विदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे ७ जिल्हा परिषद सदस्य जिंकलेले आहेत. वर्ध्यात 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत. रामटेक येथे 3 नगरसेवक निवडून आलेले आहेत. नागपूर, वर्धा, गडचिरोली या तीन जिल्ह्यांत राष्ट्रीय समाज पक्ष विजयी झालेला आहे. युती कोणासोबतही नव्हती, तरी आम्ही जिंकलेलो आहे. पहिला आमदार मराठवाड्यात जिंकला, दुसरा पश्चिम महाराष्ट्र आणि पुन्हा मराठवाड्यात जिंकून आला. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी मोठमोठी भाषणे केलीत. पुणे जिल्ह्यात आमदार जिंकला, आता राज्याच्या अध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यात आमदार केला तरच, तुमच्या बोलण्याला अर्थ राहणार आहे, नाहीतर काहीही होणार नाही. आम्ही भाजप बरोबर युती केली, पण त्यांच्यापेक्षा आमची जास्त मजबुरी होती. कारण आपल्याला सत्ता मिळतीया. युती आघाडीच्या राजकारणात कार्यकर्त्याची माती होती. कारण एकालाच सत्ता मिळती, पण ती सत्ता खरी नसती. आपल्या जिल्हाध्यक्षाचे नाव जिल्हा नियोजन समितीला पाठवले, तर मित्रपक्ष आपल्या कार्यकर्त्याचे नाव घेत नाही, दुसऱ्याच पक्षाच्या माणसाला घेतात. त्यामुळे कार्यकर्त्याला ताकद भेटत नाही. जिल्हाध्यक्ष काय म्हणतात, बर झाल जानकर साहेब युती करतात. महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी खूणगाठ बांधली आहे, २८८ जागांवर माणसे तयार करावी लागतील. प्रस्थापित पक्षाची कोणती आयडॉलॉजी आहे हे मला चांगलं माहित आहे, आयडालॉजीचा माझ्यावर सोडून द्या. सत्ता आल्यावर कोणाला कुठे फिरवायचं त्याचं नाव सत्ता असते. प्रत्येक विधानसभेत जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांनी अगोदर चांगला सक्षम माणूस शोधण्याचा प्रयत्न करा. माझी तुम्हाला विनंती आहे, 288 जागा लढवा, पण आपली ताकद वाढली पाहिजे. बिहारच्या अध्यक्षाचा अभिनंदन करेन कारण लोकसभेला त्यांनी 16 जागांवर उमेदवार उभे केले. बिहार मधून 25 उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास त्यांनी काल व्यक्त केला. त्यांना मी नमन करतो, ब्राम्हण समाजाचा माणूस आहे. हाच राज्यसभेचा पाहिला उमेदवार असेल. मध्यप्रदेश अध्यक्ष तेथून आमदार विजयी करतील. विदर्भात आम्ही कमी होतो, पण तोसिफ शेख सारखा चांगला माणूस मिळाल्यामुळे त्यांनी मेहनतीने सारी मराठा समाजाची फौज उभा केली. तोसीफचे मी अभिनंदन करतो. 

वर्धापन दिन कार्यक्रमात महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

श्री. जानकर पुढे म्हणाले, मला माहित आहे, काही ठिकाणी एक लाख मते पडतील, काही ठिकाणी 65 हजार मते तर काही ठिकाणी 10 हजार मते पडतील. दहा-बारा आमदार होऊ द्या; एखाद्या वेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचाच मुख्यमंत्री होईल, याची काळजी करू नका. माझा एक आमदार होता तरी 1 कॅबिनेटमंत्री, 1 राज्यमंत्री होता. 15 आमदार द्या, तुम्हाला मुख्यमंत्री द्यायची सोय करतो. मी इंजिनीयर आहे. बुद्धिने इंजिनियर झालोय, पैसे भरून इंजिनियर झालेलो नाही. कमी ताकतीवर जास्त डोकं लढवतो. त्यामुळे कार्यकर्त्यानी निवडून येणारी माणस बघा. 

माझे तुम्हाला नम्र विनंती आहे, आपल्या जातीचा माणूस बघू नका, आपल्या पातीचा माणूस बघा. मराठा जातीचे होते, 14 मुख्यमंत्री झाले तरी, मराठ्यांनादेखील आरक्षण का मागाव लागत आहे? याचा आपण विचार केला पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्ष ज्याला तिकीट देईल, तोच माझ्या जातीचा, तोच माझ्या पातीचा, तोच माझा भाऊ, तीच माझी आई. जानकर साहेबावर तुम्ही प्रेम करत असाल तर, आम्ही दगड दिला तरी तुम्ही दगडाला आमदार, खासदार तुम्ही केले पाहिजे. एखादा समाजाचा चमचा येईल आणि तो चमचेगिरी करेल. भाजप, काँग्रेस शिवसेना यांच्यातून समाजाचा चमचा येईल, त्यांच्यापासून सावध राहा. तुम्हाला धोका होणार आहे. तुम्हाला विकासाचा मोका साधायचा असेल, तर तुम्हाला आपली पार्टी शोधावी लागेल. ओबीसीचा भरपूर मेळावा झाला, पण ओबीसीचे दिशा कुठे आहे. मतदान कोणाला टाकणार. परत माणसं म्हणणार, साहेब तुमचा विचार चांगला आहे पण तुमचा माणूस निवडून येत नाही. एक तर महविकास आघाडीचा येईल नाहीतर महायुतीचा येईल, अशी चर्चा चालेल, पण तुम्ही त्याचा विचार करू नका. एक दिवस रासपाचे दिल्लीवर राज्य येईल, असा विश्वास श्री. जानकर यांनी व्यक्त केला. 

रासप राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांचा सन्मान करताना विदर्भ अध्यक्ष तोसिफ शेख, सचिव संजय कन्नवार, अकोला जिल्हाध्यक्ष दादाराव ढगे, केशव मुळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सुरत, आगरा, दिल्ली, पणजी, पुणे, नागपूर, मुंबई असे वेगवेगळ्या राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्धापनदिन झाले. लोकसभा निवडणूकित माढा, बारामती, परभणीची तयारी केली. तेव्हा महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाने एक जागा खेचून आणली. मी माझ्या चिन्हावर लढलो. महायुती आणि महाविकास आघाडीला बाजूला ठेवायचे असेल तर आमच्या दहा-पंधरा सीट आल्या तर सरकार बनवून देणार नाही, असा खणखणीत इशारा महादेव जानकर यांनी दिला. विदर्भात केवळ बाळापूरची भाषा करून चालणार नाही, सर्व जागा लढवायचे आहेत. सर्व जागा निवडून येतील असे नाही, पण जिंकणाऱ्याला देखील पाडू शकतो. राजकारणात उपद्रव्यमूल्य वाढलं पाहिजे. आमच्या महासचिवाने सांगितलं राज्यसभा मिळाली नाही. तुम्हाला भाजपने राज्यसभा का द्यावी? आय एम नॉट डिमांडर. आय एम कमांडर. आम्ही भीक मागणारे नाही. रासपचे आमदार निवडून आणू आणि रासपच्या आमदाराच्या ताकदीवर राज्यसभेवर जाऊ. नको तुमची राज्यसभा, आम्हाला नाही पाहिजे भीक, तुमचं तुम्ही सुखाचा राज्य करत बसा. आम्हीच तुम्हाला सत्तेत आणले, आम्हीच तुम्हाला घरात बसवू शकतो, त्याचं नाव महादेव जानकर आहे. मोठेपणा म्हणून सांगत नाही महादेव जानकरचं एक हेलिकॉप्टर लँड झालं तर सत्ताधारी आमदार पडला. माझे दोन हेलिकॉप्टर लँड झाली तर रासपाच आमदार जिंकला. आता मी काय स्वतः आमदारकी लढणार नाही, मी फक्त प्रचारालाच जाणार. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला तुमचं स्वतंत्र सरकार आणायचे असेल तर तुम्हाला तुमच्या पायावर उभे राहावे लागेल. भाजप, काँग्रेस तुम्हाला कधीच न्याय देऊ शकणार नाही, यांना वाकवायची ताकद तुम्हाला उभी करावी लागेल, तशी तयारी मी ठेवलेली आहे. आम्ही मंत्री होतो. आम्ही त्यांना मदत केली, त्यांनी आम्हाला केली, आमचा तसा पैरा फीटलेला आहे. आम्ही दुसऱ्या सोबत पैरा करू शकतो, काळजी करू नका. रासपच्या कार्यकर्त्यांनी बेसावध राहू नये. पक्षाचचे संघटन वाढले पाहिजे. सत्ता आणण्यासाठी महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी वाढली पाहिजे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रासपाचे सरकार आणण्यासाठी मोलाचं काम करा. निवडून येणारा उमेदवार कुठल्या जाती धर्माचा आहे, याचा विचार करू नका, जरी तो आपल्या विरोधात बोलला असेल तरी, पहिले त्याला पायघड्या टाका. ज्याला वाटते आमदार होऊ, त्याला घरी बसवू. आपले पण आमदार आले पाहिजेत या दृष्टीने विचार करा. गावागावात आपलं संघटन पाहिजे. आपल्यातच राहून आपल्या पक्षात अडसर ठरतात, ते पहिले अडसर दूर करा. पक्ष वाढवणाऱ्यापेक्षा पक्ष रोखणारी माणसं शोधा, तुमचा पक्ष वाढल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याच पक्षाला महाराष्ट्रात बहुमत मिळणार नाही. लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळाले, ते मिळणार नाही. कारण दलित, मुस्लिम बांधव नाराज झालेत. आपण नीट गणित केले तर निश्चितपणे आपला विजय होऊ शकतो. भल्याभल्यांना घरी बसवू शकतो. आपलाही आमदार विजय होऊ शकतो, हा विश्वास तुम्ही अकोल्यातून घेऊन जावा. देश व राज्यातील पदाधिकाऱ्यानी आपापल्या तालुक्यात जिल्ह्यात उमेदवार निवडून कसे येतील याकडे लक्ष द्या. आपण कुणाशीही युती, आघाडी करायची नाही, या मताशी मी सहमत आहे. युतीमुळे धोकाही होऊ शकतो. आपण जर युती केली नसती, तर आपल्या पक्षाला मान्यताही मिळाली असती. निवडणुका जवळ आल्या की, मोर्चे जास्त निघतात. निवडणूक झाली की हे मोर्चे बंद होतात. या देशात ज्यांना ज्यांना राजसत्ता मिळाली त्यांचे प्रश्न सत्तेत्तून सुटलेत. आरक्षणाचे असे झालेय, जे पक्ष एकीकडे आरक्षण देऊ म्हणतात आणि दुसरीकडे त्याच पक्षाची संघटना न्यायालयात आरक्षण देऊ नका, म्हणून याचिका टाकतात. हे मराठा आरक्षण धनगर आरक्षणाच्या बाबतीत घडलेय.

आता आपली कोणाशीही युती, आघाडी होणार नाही. समझोत्यासाठी माझ्याकडे काहीजण आले होते, पण मी त्यांना सांगितले. आम्ही आता कोणाला वाईट म्हणणार नाही, आम्हीच आमची रेषा वाढवतोय. आमची ताकद किती आहे ते आम्हाला बघायचीय, काही फरक पडत नाही. आपल्याच पक्षाचा सहारा घेऊन काही आपल्याला मदत करणार आहेत, पण त्यांच्यापासून सावध राहावे. त्यांना म्हणायचं एक तर आमच्या आळीला रहा, नाहीतर त्यांच्या आळीला रहा, त्याच्याबद्दल दुःख नाही. अशा लोकांपासून सावध राहून, आपला पक्ष वाढवण्याची भूमिका करा.

राजाच्या सर्व प्रदेशात वेळ देऊन आपापली ताकद वाढवावी. स्वामी विवेकानंदाचा एकात्मवाद, महात्मा फुलेचा समतावाद घेऊन हे राष्ट्रीय समाज पक्षाचे दल निर्माण केले आहे. कोणाचा कोणता वाद असेल, पण आमचा 'सब समान तो देश महान', समतामुलक समाजाची निर्मिती झाली पाहिजे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे भूमिका आहे. कोण धर्माच्या नावानं, कोण जातीच्या नावाने भांडण लावतय, ही नाटक आता बंद पडायला लागली. जे सत्य असेल ते सत्य सांगितले पाहिजे. सत्यशोधन केलं पाहिजे, राष्ट्राचे हित केले पाहिजे. पूर्व विदर्भात नागपूर येथे अधिवेशन पार पडले आणि आता पश्चिम विदर्भात एक अधिवेशन पार पडले. अकोल्याच्या टीमचा महादेव जानकर यांनी मनापासून अभिनंदन केले.

महादेव जानकर यांच्या मार्गदर्शना अगोदर एस. एल. अक्कीसागर, कुमार सुशील, काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, सुवर्णाताई जऱ्हाड पाटील (अहील्यानगर), सुनीलदादा बंडगर (सोलापूर), केशव मुळे (अकोला), राजू गोरडे(बुलढाणा), तोसिफ शेख(अमरावती), संजय कन्नावार(चंद्रपुर), अजित पाटील(सांगली), अभिजित पाटील(नाशिक), प्रा. बंडू डोंबाळे(जत), विकास पाटील(धाराशिव), नागनाथ बोडके(लातूर), डॉ. प्रल्हाद पाटील(शेवगाव), दादासाहेब दोरगे (माण, सातारा), किरण होले पाटील(दर्यापूर), आण्णासाहेब मतकर(बीड), प्रवीण पाटील(मलकापूर), शरद दडस (नवी मुंबई), विशाल सरगर(आटपाडी), बालाजी पवार(पुणे), शिवाजी शेंडगे, प्रा. विष्णू गोरे यांची भाषणे झाली. राज्यभरातून जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ पदाधिकारी व अकोला जिल्ह्यातील सर्व आघाडीचे पदाधिकारी यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. राज राजेश्वर नगरीत राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...